(भक्तीधामच्या ज्ञानोदय विद्यालयात गांधी जयंती साजरी )
चांदुर बाजार/प्रतिनिधी:-
गांधीजींचा आचार हाच गांधीवाद आहे. गांधीवादाचा संपूर्ण जगावर प्रभाव आहे गांधीवाद धार्मिक, अध्यात्मिक मानवतावाद आहे .महात्मा गांधी हे विश्वातील सर्वात थोर व्यक्तीमत्व व गांधीवाद जगातील अभूतपूर्व वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी आहे.
अशा आशयाचे उदगार डॉ. सतीश यांनी काढले. गांधी जयंती निमित्त गुलाबराव महाराज सेवा संस्थान भक्तीधाम चांदूरबाजार येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. समारंभाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले होते तर अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सतीश मोहोड उपस्थित होते. डॉ सतीश तराळ पुढे म्हणाले अमेरिकेचे जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स यांनी १९२० सालीच गाधींचा उल्लेख जगातील सर्वात महान व्यक्ती असा केला होता तर विश्वविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी गांधींना युगातील सर्वश्रेष्ठ माणूस संबोधले होते. सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता तर रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांचा उल्लेख महात्मा असा केला. लोकमान्य टिळकांनी अवंतिका गोखले यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधींबद्दल गौरव उद्गार काढले व माझ्यानंतर गांधी देशाचे नेतृत्व करतील असा विचार मांडला होता.जगातील मोठे नेते, विचारवंत ,शास्त्रज्ञ सर्वांवरच गांधींचा प्रभाव होता. महाराष्ट्रातील लेखकांनी व विचारवंतांनी गांधीजींवर प्रचंड अन्याय केला. विनोबा आणि साने गुरुजी गांधींचा विचार आत्मसात करून लिहिणारे लेखक आहेत. गांधीजींनी आत्मज्ञानाची वरची पातळी गाठली होती .ते जगाचे स्फूर्तीदाते होते. गांधी हे स्थलकालातील व्यक्तिमत्व आहे. ख्रिस्त, बुद्ध यांच्या बरोबरीचे स्थान गांधींना प्राप्त झाले आहे. विश्वात राष्ट्रीयत्वाची व देशभक्तीची भावना निर्माण करण्यात गांधींचा वाटा महत्त्वाचा आहे. एकादशव्रत, असहकार, सर्वोदय, सत्याग्रह ही गांधींची विश्वाला देणं आहे. अहिंसेने स्वातंत्र्य मिळवणारे ते विश्वातील एकमेव लोकनेते आहेत. सर्व वैश्विक समस्यांची उत्तरे गांधीवादात आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. केशवराव ठाकरे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन अनुराधा इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन महानंदा खाडे यांनी केले कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते














