*पुणे-छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह, बदनामीकारक व विकृत स्वरूपाचे लिखाण करणाऱ्या जेम्स लेन प्रकरणात आज पुन्हा एकदा न्याय मिळाल्याने इतिहासाच्या सन्मानासाठी लढणाऱ्यांच्या संघर्षाला यश प्राप्त झाले आहे.*
*लंडन येथील नामांकित ऑक्सफर्ड विद्यापीठाने, सदर प्रकरणात देशातील अग्रगण्य इंग्रजी वर्तमानपत्रा मार्फत जाहीर माफी मागण्यास व संबंधित लिखाणाबाबत खेद व्यक्त करण्यास तयार असल्याची लेखी कबुली, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सादर केली आहे.*
*हा निर्णय केवळ एका खटल्याचा निकाल नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाचा विजय आहे. या विकृत लिखाणा विरोधात प्रथमच ठोस आवाज उठवणाऱ्या संभाजी ब्रिगेडने अन्याया विरोधात उभे राहून संपूर्ण देशाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले होते.*
*त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील घटनेनंतर, मोठ्या प्रमाणावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.*
*या फौजदारी खटल्यात 72 संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न, दंगल, ऐतिहासिक दस्तऐवज नष्ट करणे व दहशत निर्माण करणे यासारखी गंभीर कलमे लावण्यात आली होती.* *तब्बल 12 वर्षे हे कार्यकर्ते पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्यात अडकून होते.*
*या दीर्घकालीन व गुंतागुंतीच्या खटल्यात, पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी 72 मावळ्यांच्या वतीने प्रभावी, निर्भीड व कायदेशीर लढा उभा करत सर्व 72 आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करून घेतली.*
*हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा असून, सत्य आणि न्याय कधीही पराभूत होत नाही याचा प्रत्यय देणारा आहे.*
*आजचा दिवस इतिहास, स्वाभिमान आणि न्याय यांचा संगम ठरला असून, छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातोश्री यांच्या चारित्र्यावर झालेल्या अन्यायकारक आरोपांना व संभाजी ब्रिगेड त्यांचे 72 मावळे तसेच तमाम शिवप्रेमी व एका मातेच्या स्वाभिमानाला ठोस उत्तर मिळाले आहे.*
ॲड. मनोज आखरे
प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड











