.
५ जुलै पासून ‘सातबारा कोरा कोरा कोरा’यात्रेला प्रारंभ
अमरावती/प्रतिनिधी
शासनाच्या धोरणांमध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांच्या न्यायहक्कांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘सातबारा कोरा करा’ ही १३८ किलोमीटरची पदयात्रा ५ जुलै पासून सुरू होणार आहे.शेतकऱ्यांना जोपर्यंत सरकार न्याय देणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून यात्रेला प्रारंभ होणार असून, चिलगव्हाण (साहेबराव करपे – पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांचे ग गाव) येथे या यात्रेचा समारोप होईल. ही यात्रा उंबरडा बाजार, बोदेगाव, दारव्हा, तिवरी, तूपटाकळी, काळी दौलत, गुंज या प्रमुख ठिकाणांवरून मार्गक्रमण करणार असून एकूण सात दिवसांत १३८ किमी अंतर पार केले जाणार आहे.
ही यात्रा केवळ एका राजकीय व्यक्तीची नसून, ती शेतकरी व कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठीची लोकचळवळ आहे. सक्तीची कर्जवसुली थांबवणे आणि तात्काळ कर्जमाफी लागू करणे या प्रमुख मागण्यांवर ही यात्रा केंद्रित असणार आहे. दरम्यान प्रत्येक ठिकाणी सभा, संवाद व स्थानिक अडचणी समजून घेण्यासाठी थांबे घेतले जातील.
यात्रेदरम्यान शेतकरी आत्महत्यांना आळा घालणारी धोरणं लागू करणे, विधवा व अपंगांसाठी रोजगार व सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करणे, मनरेगा अंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंतच्या कामांचा विस्तार व मजुरीत वाढ करणे आणि तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे यासारख्या मागण्या मांडण्यात येणार आहेत.
चौकट :-
बस झाल्या आता आत्महत्या !
“बेमुदत अन्नत्याग आंदोलनात लाखो शेतकरी मला पाठिंबा देण्यासाठी आले होते. आता मी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी त्यांच्या गावीच चालत जाणार आहे. ही यात्रा तुमच्यासाठी, तुमच्या पोटासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी आहे. पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून एकत्र या. मतदान कोणालाही करा, पण कष्टकरी माणसासाठी एकत्र या.”
बच्चू कडू
माजी राज्यमंत्री
